मुंबई – महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असले तरी सरकारमध्ये वरचष्मा मात्र या आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच दिसत आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तारात आणि आता खातेवाटपातही ‘वजनदार’ खाती आपल्याकडे खेचून घेत पवारांनी आपली ‘पॉवर’ दाखवली आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुख, डॉ. जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीतील निष्ठावंत नेत्यांच्या पदरी महत्त्वाच्या खात्यांचे दान टाकत पवारांनी त्यांच्या निष्ठेची कदर केली आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गृह आणि वने ही खाती पुन्हा एकदा विदर्भाच्या पारड्यात पडली आहेत.
खातेवाटपावर नजर मारल्यास शिवसेनेसाठी हा ‘घाटे का सौदा’ ठरला असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही मोजकीच खाती आपल्याकडे ठेवली आहेत. मुख्यमंत्र्यांनंतर शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती आहेत. सुभाष देसाई यांना उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार खात्यांची धुरा असेल. अॅड. अनिल परब हे नवे परिवहन व राजशिष्टाचार मंत्री असतील. उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण तर दादाजी भुसे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेल्या खात्यांचा विचार करता शिवसेनेकडे तुलनेने कमी महत्त्वाचीच खाती आली आहेत. त्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे मात्र पक्षातील वजन वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोकणातील दीपक केसरकर, भास्कर जाधव या अनुभवी नेत्यांना मागे टाकत थेट कॅबिनेट मंत्रिपदी मुसंडी मारणाऱ्या सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद मिळवण्यात यश मिळवले आहे.
अनिल देशमुखांची बाजी, आव्हाडांना निष्ठेचे फळ
मंत्रिमंडळ विस्तारात अर्थ आणि गृह ही दोन प्रमुख खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. आधीच्या खातेवाटपात गृह खाते शिवसेनेकडे होते. ते सेनेने आता राष्ट्रवादीला सोडले आहे. अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देताना गृह खाते थेट अनिल देशमुख यांच्याकडे देऊन शरद पवार यांनी पक्षातीलच अनेकांना धक्का दिला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे खाते महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील आहे. या खात्यासाठी नागपूरमधील काटोल मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले अत्यंत विश्वासू व स्वच्छ प्रतिमेचे नेते अनिल देशमुख यांच्यावर पवारांनी विश्वास टाकला. ६९ वर्षीय अनिल देशमुख यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव असून ती त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनाही गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. आव्हाड यांना एकप्रकारे हे निष्ठेचेच फळ मिळाले आहे. राष्ट्रवादीतील दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या तुलनेत आव्हाडांना अधिक महत्त्वाचे खाते देऊन पक्षातील दुसऱ्या फळीला बढती देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. हसन मुश्रीफ यांनी मधल्या काळात भाजपविरुद्ध मोठा संघर्ष केला. त्यांच्या ठिकाणांवर आयकर छापेही पडले होते. त्यानंतरही कागलमधून दणदणीत विजय मिळवणाऱ्या मुश्रीफ यांना ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे.















