महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा,चे नुतन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे न्युज चॅनेल ‘बीआर न्युज’ ने त्यांच्या लोकप्रीय कार्यक्रम ‘बीआर कट्टा’ वर निमंत्रीत करून संपादक मनिष केत यांनी , प्रसार माध्यमे, पत्रकारांचे प्रश्न या विषयावर मॅरेथॉन मुलाखत घेतली. प्रचंड गाजलेली ही मुलाखत लिखीत स्वरूपात जशीच्या तशी…

प्रश्न : पत्रकार व्हायचे ठवलेच होते की, घरात कोणी पत्रकार होते? पत्रकारीतेत कसे आलात?
उत्तर : मी ठरवून पत्रकारीतेत आलो नाही. घरात पत्रकारच काय, कोणी शिकलेलेही नव्हते. शाळेत गेले पाहिजे एवढा आईचा आग्रह होता. शिक्षणासाठी अंबाजोगाईला आलो आणि योगायोगाने घडलेल्या घटनेने एका पत्रकाराची भेट झाली अन् पत्रकार आणि पत्रकारितेविषयी माझ्या मनात आकर्षन निर्माण झाले. पत्रकार झाल्यानंतर बातम्या लिहीत असताना माझ्या आईला कोणीतरी सांगीतले की, तुमचा मुलगा पत्रकारागीर झाला आहे. यावेळी आईन कुतुहलाने विचारले, ‘‘हे पत्राकारागीर म्हणजे कुठला डब्याचा कारखाना आहे काय?’’ यावेळी मी आईला पत्रकार म्हणजे काय, हे समजून सांगीतले. यावेळी आई म्हणाली ‘चांगलं आहे, जे करायचं ते चांगलं कर’

प्रश्न : योगायोगाने घडलेल्या घटनेमुळे तुम्ही पत्रकारितेकडे आकर्षीत झालात, ती घटना काय होती?
उत्तर : मी दहाविला असताना आईसोबत रोजगार हमीच्या कामावर जात असे. दरम्यान कामगार संघटनांच्या मागणीमुळे मजूरीचा फरक मंजूर झाला. तो फरक वाटप करताना अधिकार्यांनी सह्या घेतल्या मात्र चेकवर लीहीलेली रक्कम आणि प्रत्यक्षात दिलेले पैसे यात मोठी तफावत होती. यावेळी मी योगेश्वरी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. मोटेगावकर सर हे दै. लोकमत चे पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांच्या कानी मी हा विषय घातला. ते म्हणाले ‘चल त्या ऑफीसला जावू’. स्कुटरवर मला मागे बसवून आफीसमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर थेट विषयाला हात घालत जेव्हा लोकमत कार्ड समोर टाकले तेव्हा सारे कार्यालय खाडकन उठून उभे राहीले. सर्वांची घाबरगुंडी उडाली. दुसर्याच दिवशी गावात येऊन त्यांनी सर्व मजूरांचे नियमाप्रमाणे पैसे वितरीत केले. या घटनेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला . पत्रकारांमध्ये ईतकी ताकत असेल तर आपण का पत्रकार होऊ नये असा मनात विचार आला अन् पत्रकारितेकडे ओढल्या गेलो.
प्रश्न : पत्रकारिता सामान्य माणसाचा आवाज आहे, हे कळाल्याने आपण पत्रकारितेकडे वळलात. पत्रकारितेत आल्यानंतर प्रामुख्याने कोणते विषय हाताळले?
उत्तर : ऊसतोड कामगारांच्या व्यथा, शिक्षण क्षेत्रातील त्रुटी आणि शेतकर्यांचे मुलभूत प्रश्न या विषयावर मी सातत्याने लिहीले. ऊसतोड मजूरांवर लिहीत असताना साखर कारखान्यावर जावून दहा दिवस त्यांच्या सोबत राहीलो. त्यावेळी मी दै. लोकपत्र मध्ये काम करत होतो. सलग एक महिनाभर वृत्तमालिका लिहून ऊसतोड मजूरांच्या व्यथा मांडल्या. या वृत्त मालिकेला ‘समर्थ’ ने पुरस्कार देऊन मला शिष्यवृत्ती दिली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सप्त्यासाठी लाखो रूपयांची वर्गणी करून गोळा करून टोलेजंग मंदीरे बांधली जातात. दुसरीकडे मात्र ज्या ज्ञानमंदीरात लहान मुले शिकायला जातात त्या शाळेत मुलांना बसायला जागात नसते. शाळेचा गळत असलेला साधा पत्राही बदलला जात नाही. शाळेत पाणी नसते. यावर मी सप्त्यासाठी गोळा केलेले अर्धे पैसे शाळांवर खर्च करा या अनुषंगाने लिहीले. दरम्यानच्या काळात दै. लोकसत्ता च्या माध्यमातून शेतकर्यांच्या मुलभूत प्रश्नांना बातम्यांच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडली. प्राप्त परिस्थितीवर मात करून शेती करणार्या आणि कमी क्षेत्रात लाखो रूपयांचे उत्पन्न घेणार्या शेतकर्यांच्या सक्सेस स्टोर्या लिहील्या. शेतकर्यांनी आत्महत्या न करता प्रतिकुल परिस्थितीवर मात केली पाहिजे या अनुषंगाने मी शेती आणि मातीवर लीहले.
प्रश्न : महाराष्ट्र शासनाच्या अधिस्विकृती समितीचे विभागीय अध्यक्ष म्हणून आपण कोण कोणते वेगळे उपक्रम राबवले?
उत्तर : 2015 मध्ये मी पहिल्यांदा औरंगाबाद विभागीय अधिस्विकृती समितीचा अध्यक्ष झालो. यानंतर शासनाची पत्रकारांसाठी काम करणारी कमीटी असेल तर त्या कमीटीने पत्रकारांच्या समोर गेले पाहिजे. समोर गेल्याशिवाय पत्रकारांचे खरे प्रश्न कळणार नाहीत. अधिस्विकृती मिळवण्यात पत्रकरांच्या काय अडचणी आहेत, हे कळणार नाही. या भूमिकेतून प्रशासकीय यंत्रणा, डायरेक्टर, जिल्हा माहिती अधिकारी, मी अध्यक्ष आणि समितीच्या सर्व सदस्यांनी पत्रकारांसमोर जाऊन खुल्या चर्चेव्दारे त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. बीड येथे पहिली खुली चर्चा झाल्यानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा बैठका घेतल्या. यातून ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती मिळण्यात पे स्लीप ही मुख्य अडचण असल्याचे लक्षात आले. पे स्लीप असल्याशिवाय अर्जच दिला जात नव्हता. यावर आम्ही तोडगा काढला. संपादक आणि पत्रकार यांच्यातील करारनामा असेल तरी त्यांना अधिस्विकृती देण्यात यावी, यासाठी प्रयत्न केले अन् याला यशही आले. दुसरी गोष्ट म्हणजे अधिस्विकृतीची खरी गरज ग्रामीण पत्रकारांना आहे, हे शासनाच्या लक्षात आणून दिले. तत्कालीन महासंचालक यांना आमचे म्हणने पटले अन् तालुका पातळीवरील पत्रकारांना अधिस्विकृती देण्याचा निर्णय महाराष्ट्र पातळीवर घेण्यात आला. याची सुरूवात आम्ही माजलगाव येथील जिल्हा देनीकाच्या एका ग्रामीण पत्रकाराला अधिस्विकृती देऊन केली.
प्रश्न : अधिस्विकृती मिळवण्यात अनेक किचकट नियमांचे अडथळे आहेत. हे अडथळे दुर होऊन सुटसुटीत प्रक्रिया झाली पाहीजे.
उत्तर : अधिस्विकृती मिळवण्यात अनेक किचकट नियमांचे अडथळे आहेत, हे खरे आहे. आमचे देखील शासनाकडे हेच म्हणने आहे, की तुम्हाला पत्रकारांना अधिस्विकृती द्यायची आहे ना, मग ती देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करा. पत्रकारांना द्यायचे आहे, तर थेट द्या. अधिस्विकृती कार्ड फार महत्वाचे आहे, ते चुकीच्या लोकांकडेही गेले नाही पाहीजे. कारण असे कार्ड शासकीय कर्मचारी, लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनाच दिले जाते. त्याचा दुरूपयोगही झाला नाही पाहिजे. ते चुकीच्या माणसाकडे जाऊ नये याची काळजी पत्रकारांनीही घेणे गरजेचे आहे. पण याचा अर्थ ते मृगजळासारखे ठरू नये. किचकट नियम, अटी आणि शर्थी शिथील करून ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती देण्याचे नियम सुटसुटीत करावेत हाच माझा आग्रह आहे अन् शासन दरबारी यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.
प्रश्न : अलीकडच्या काळात सोशल मिडीयामुळे पत्रकार आणि पत्रकारीतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
उत्तर : जळगाव आणि पुणे येथील पत्रकारांच्या अधिवेशनात मी या विषयावर बोललो आहे. सोशल मिडीयामुळे प्रींट आणि ईलेक्टॉनिक मिडीयावर काही विपरीत परिणाम होतो आहे, असे मला वाटत नाही. सोशल मिडीयाचा प्रभाव हा तात्कालीक आहे. कारण प्रींट मिडीया आणि इलेक्टॉनिक मिडीया बाबत लोकांचा दृष्टीकोण आजही विश्वासहर्ततेचा आहे. सोशल मिडीयावर कोणाचा कंट्रोल नाही, यामुळे लोकांचा या मिडीयावर विश्वास नाही. चुकीच्या गोष्टीसाठी सोशल मिडीया कदाचित प्रभावी असेलही मात्र चांगल्या गोष्टीसाठी लोक आजही प्रींट मिडीयावरच विश्वास ठेवतात.
प्रश्न : पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. पत्रकार हल्ला विरोधी कायदा तर पारित झाला मात्र त्याच्या अमलबाजवणीचे काय?
उत्तर : हे खरे आहे, पत्रकार हल्ला विरोधी कायदा पारित करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांना 15 ते 20 वर्षे संघर्ष करावा लागला. मागच्या सरकारने कायदा पारित केला. नंतर तो दोन वर्षे अंतीम मंजूरीसाठी अडकला गेला. आता मंजूरी आल्यानंतर अधिसुचना जारी झाली. यानंतर एक गुन्हा जालना येथे आम्ही नोंदवला आहे. राज्यात आजही मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. यामुळे कायदे होतात मात्र त्याची अंमलबजावणी होते का? हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. या पत्रकारांच्या कायद्याची देखील प्रशासकीय यंत्रणा निटपणे अमलबजावणी करत नाही, असे माझे स्पष्ट मत काही घटनांवरून झाले आहे. पत्रकारांनी संघटीत होऊन सरकारकडे कायद्याची स्पष्टपणे अमलबजावणी करा म्हणून पत्रकारांनी प्रेशर वाढवण्याची गरज आहे. पत्रकारांवर फक्त बातमी लिहीली म्हणून हल्ला होत असेल तर त्या पत्रकाराला न्याय मिळाला पाहीजे. जो कोणी त्रास देत आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोरपणे अमलबजावणी झाली तर पुन्हा कोणी पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. कायद्याच्या अमलबजावणीसाठी आम्ही सरकारकडे भांडत आहोतच पण सर्व पत्रकारांनी देखील संघटीत होऊन सरकारवर प्रेशर वाढवले पाहीजे.
प्रश्न : जनसामान्यांचा आवाज बनून पत्रकार काम करतात. स्वत:चे प्रश्न मात्र त्यांना मांडता येत नाहीत. तेे ईतर कोणाला दिसतही नाहीत अन् सुटतही नाहीत. पत्रकारांच्या घराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
उत्तर : खुप चांगला प्रश्न आहे, गेल्या वीस वर्षापासून आम्ही या प्रश्नावर सरकारशी भांडत आहोत. नेमकं काय होतं, आपण समाजाचे प्रश्न मांडतो. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत असे म्हणतो. पण या सर्वांमध्ये आपण आपल्यालाच मोजत नाहीत. समाजही आपल्याला मोजत नाही. ज्यावेळी एखाद्या पत्रकारावर दुर्दैवाने कठीण प्रसंग गुजरतो त्यावेळी किती समाज त्याच्या पाठीशी उभा राहातो? पत्रकार जो पर्यंत काम करत आहे, त्याच्याकडे चांगले बॅनर आहे, तो पर्यंत त्याला मान- सन्मान सर्व काही मिळते मात्र अचानक दुर्दैवी घटना घडल्यास त्या दिवशीचे भागवण्याचीही पत्रकाराची परिस्थिती नसते. सराकार सर्व समाज घटकाचा न्याय देण्याचा विचार करत असेल तर यात पत्रकार हा देखील एक घटक आहे. त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. पण सरकार कधीच पत्रकार या घटकाचा विचार करत नाही. सरकार समाजातील सर्व घटकांना घरे देते. वेगवेगळ्या समाज घटकांसाठी किती गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्या. या संस्थांना सरकारच्या अनेक सवलतीही आहेत. पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थांना मात्र सरकारने सवलती दिल्या नाहीत. यामुळे या संस्था स्थापन होऊ शकल्या नाहीत. मागील सरकारच्या काळात दिलीप सपाटे यांनी मुंबई येथील पत्रकारांसाठी सरकारशी भांडून आणि सातत्याने पाठपुरावा करून म्हाडा अंतर्गत विशेष गट करुन स्वतंत्र गृहनिर्माण योजना पत्रकारांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला. मी याचे समर्थन केले. हाच पॅटर्न आता तालुका पातळीपर्यंतच्या ग्रामीण पत्रकारांसाठी राबवला गेला पाहिजे. यासाठी विद्यमान राज्य सरकारकडे अधिवेशनात आम्ही प्रस्ताव सादर करणार आहोत. संघटनेच्या माध्यमातून महाडाअंतर्गत राज्यभरातील पत्रकारांना घरे मिळतील यासाठी आमचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
प्रश्न : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पत्रकारांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे?
उत्तर : बीड जिल्ह्यात काम करत असताना मागील आठ- दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघात काम करत आहे. संघटनेचे प्रमुख संयज भोकरे साहेब ईतर मान्यवरांनी माझ्यावर एवढी मोठी जवाबादारी सोपवली. ही खुप मोठी जवाबदारी आणि जिम्मेदारी देखील आहे. राज्यभरात 8 हजारपेक्षा अधिक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. पत्रकारांच्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी पत्रकारांच्या मुळ प्रश्नांकडे जाणार आहे. अतिषय छोट्या गावातून पुढे येऊन मी पत्रकार बनलो, यामुळे ग्रामीण, तालुका, जिल्हा आणि शहरी अशा सर्व स्तरातील पत्रकारांच्या प्रश्नांची मला जान आहे. यामुळे सर्व पत्रकारांचे प्रश्न सुटले हा माझा प्रमुख अजेंडा असणार आहे. सरकारशी समन्वय साधून, पाठपुरावा करून ते सोडवण्यालाप्राधान्य राहील. पण गरज पडलीच तर रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचीही तयारी आहे.
प्रश्न : तुम्ही पहिले अध्यक्ष आहात की, जे संपादक नाहीत. पण चर्चा अशी आहे, की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा संपादकांचा संघ आहे. हे खरे आहे का?
उत्तर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा संपादकांचा संघ आहे, ही चर्चा पुर्णपणे चुकीची आहे. एक मात्र खरे आहे, महाराष्ट्रात पत्रकारीतेमध्ये ज्या दिग्गज संपदकांनी प्रचंड असे योगदान दिले आहे, ते संपादक या संघटनेशी सलग्न आहेत. तेच या संघटनेचे सल्लागार मंडळ आहे. त्यांच्या सल्ल्यानेच पत्रकार संघाचे काम चालते. मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की हे सर्व दिग्गज संपादक ग्रामीण पत्रकरांसाठी काम करतात. माझेच उदाहरण घ्या, माझ्यासारख्या ग्रामीण भागात काम करणार्या पत्रकाराला थेट राज्याचे अध्यक्ष केले. यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण हवे. या दिग्गज संपादकांमुळेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही संघटना सर्वात प्रभावी संघटना आहे. संजय भोकरे यांनी उभा केलेल्या संघटनेमुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारांचा आवाज बुलंद झाला आहे.
प्रश्न : पत्रकारीतेत ईतर लोक घुसले आहेत, यामुळे खर्या पत्रकारांवर अन्याय होतोय असे वाटत नाही का?
उत्तर : या बाबतीत माझे थोडे वेगळे मत आहे. पत्रकार हा देखील समाजातील एक घटक आहे. ईतर क्षेत्रात सर्व क्षेत्रात जसे वेगळे लोक घुसतात, ज्यांचा उद्देश वेगळा असतो. त्याप्रमाणेच पत्रकारीतेतही काही वेगळे लोक आले हे नाकारता येत नाही. मात्र या मुठभर लोकांमुळे संपुर्ण पत्रकारीता क्षेत्र बदनाम होत आहे, असे म्हणता येणार नाही. प्रमाणिकपणे काम करणारी, प्रमाणिकपणे लिहीणारी जी मानसे आहेत जे समाजाचे प्रश्न सातत्याने मांडतात. त्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतात. या प्रमाणिक पत्रकारांवर लोकांचा आजही विश्वास आहे. चार- दोन लोक ईकडे तिकडे झाले म्हणजे पत्रकारांवर अन्याय झाला असे अजीबात नाही. वाईट बातमी शोधावी लागत नाही, ती चालत तुमच्याकडे येते मात्र चांगली बातमी तुम्हाला शोधत जावी लागते. आमच्याकडे महिला शेतकर्याचे एक पुर्ण गाव आहे. या ठिकाणी महिला उत्तम शेती करतात. असेही काही शेतकरी आहेत, जे कायम दुष्काळी भागात प्राप्त परिस्थितीवर मात करत जमीनीच्या छोट्याशा तुकड्यात लाखो रूपयांचे उत्पन्न घेतात. हे लोक खर्या अर्थाने आपले आयडॉल आहेत. खरा समाज अशा लोकांवर उभा आहे.
प्रश्न : बे्रकींग न्युजच्या जमान्यात बातमीच्या सतत्येकडे दुर्लक्ष होत आहे का?
उत्तर : हे खरे आहे, 2010 नंतर माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला अन् समाजमाध्यम आपल्या हाती आले. सर्वात अगोदर बातमी देण्याची प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धेत केवळ जिंकण्याचे भान असते. या जिंकण्याच्या भानात कधी कधी चुका होतात. प्रसार माध्यमांनी जिंकण्यापेक्षा चुकीचे लोकांसमोर जावू नये याची काळजी घेतली पाहीजे. अरूण टिकेकर साहेब नेहमी म्हणाचे एखादी बातमी मिस झाली तरी चालेच मात्र चुकीची बातमी लागली नाही पाहीजे. हे पथ्य पाळले तर बे्रकींग न्यूजच्या जमान्यातही बातमीची सत्यता टीकवता येऊ शकते. याही पुढे जावून 24 तास बातम्या गरजेच्या आहेत का? असे मला वाटते. असो आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे.
प्रश्न : वृत्तपत्र असो या न्यूज चॅनेल, खाजगी मालकीचे असल्याने कठेतरी एका बाजूने झुकताना दिसतात. त्याचप्रमाणे देशातील जे काही मोठे आणि नामांकीत पत्रकार आहेत, ते देखील एकांगी वाटतात. हा कशाचा परिणाम आहे?
उत्तर : पत्रकारांनी निष्पक्ष असले पाहीजे असे म्हटले जाते. यावर माझे थोडे वेगळे मत आहे. पत्रकाराला कुठले तरी एक मत असले पाहीजे. त्याने सत्याची बाजू घेऊन ती लोकांना सांगीतली पाहीजे. आपण प्रत्येक गोष्टीत न्युटल राहून हे आणि हेही पहा असे सांगीतले तर मग तुम्ही काय ठरवले? दोन उमेदवार एखाद्या निवडणुकीत उभे असतील तर चांगला कोण? हे आपण सांगीतले पाहिजे. न्युटल का आणि कशामुळे रहायचे? समाजाचा आरसा असलेली माध्यमे न्युटल राहीली तर लोकांनी सत्य- असत्याचा शोध कसा घ्यायचा? पत्रकारांना देखील एक विचार असतो. 70 वर्षापुर्वी स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेऊन अनेक वर्तमानपत्रे निघाली. त्यांनी आपला विचार पुढे नेला अन् देशाला स्वातंत्र्यही मिळवून दिले. पत्रकाराने चांगल्या विचाराच्या बाजूने राहण्यात, चांगला विचार पुढे घेऊन जाण्यात अथवा स्वत:च्या विचाराशी प्रमाणिक असण्यात काहीही गैर नाही. मात्र पत्रकारांनी स्वत:चे विचार लोकांवर थोपवले नाही पाहिजेत. देश, समाजहित आणि चांगल्या विचारांच्या बाजूने राहीले पाहीजे.
प्रश्न : बदलत्या काळात विषय हातळण्यात पत्रकारांची प्रायवेटी बदलली आहे का?
उत्तर : सध्या सर्व प्रसार माध्यमे सध्या राजकीय व्यवस्थेच्या पाठीमागे धावत आहेत. एका व्यवस्थेच्या पाठीशी एवढे धावत असताना आपण या व्यवस्थेएवढ्या अथवा त्याहून मोठ्या आणि श्रेष्ठ असलेल्या आणखी तीन व्यवस्था आहेत, हेच आपण विसरून गेलो आहोत. केवळ राजकीय क्षेत्रातील लोकांनाच प्रतिष्ठा आहे, तोच हुशार आहे अन् तोच लोकांचे भले करू शकतो असा एक समज निर्माण झाला आहे. यामुळे माध्यमातील प्रायवेटीच बदलली आहे. यामुळे मी नेहमी पत्रकारांना विचारत असतो की तुम्ही मागील आठ दिवसात सामाजिक, शैक्षणिक, शेती आणि राजकीय अशा कोणकोणत्या विषयावर किती बातम्या लिहील्या? यावेळी 95 टक्के बातम्या राजकीय लिहील्या हे उत्तर येते. वास्तविक पाहता माध्यमांनी राजकारणापेक्षा जास्त ईतर विषयाच्या बातम्या वाचल्या, पाहिल्या जातात अन् त्या लोकांना आवडतातही हे लक्षात घेतले पाहिजे. पत्रकारांनी राजकारण्यांच्या पाठीशी धावायचे थांबवले पाहिजे. पुर्वी राजकीय मंडळी चार- दोन प्रमुख पत्रकार एकत्र कुठे भेटतील याचा शोध घेऊन ते जिथे भेटू शकतील अशा ठिकाणी स्वत: होऊन जायचे. अलीकडच्या काळातील राजकीय मंडळी स्वत: भेट घ्यायला येणे दुर, त्यांची गरज नसता तुम्ही भेटायला गेला असाल तर ते भेटण्यासाठी वेळही देत नाहीत. राजकारणी मंडळीच्या मागे पत्रकार स्वत: होऊन धावत असल्यामुळे हे घडत आहे अन् यामुळेच बातम्यांची प्रायव्हेटीही बदलली आहे. जुणे राजकीय नेते एखाद्या विषयात प्रमुख चार पत्रकारांना बोलावून घेत, कधी स्वत: होऊन त्यांना भेटायला जावून चर्चा करत असत. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, विलाराव देशमुख असे मोठे नेते देखील प्रमुख चार पत्रकारांना बोलून त्यांच्याशी चर्चा करायचे.
प्रश्न : नव्या आणि जुण्या लिडरशिपमधील फरक काय?
उत्तर : 2010 नंतरचे राजकीय नेते डीजीटल नेते आहेत. एखाद्या चौकात भले मोठे डीजीटल बॅनर लागते अन् रात्रीतून नेता तयार होतो. पुर्वी नेत्यांना आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पत्रकारांसमोरच व्यक्त व्हावे लागत असे. यासाठी दुसरे माध्यम नव्हते. यामुळे नेते पत्रकारांशी ते संवाद ठेवत. दोघांमध्ये फेस टू फेस डायलॉग व्हायचे. पत्रकार प्रश्न विचारायचे अन् नेते त्यावर उत्तर द्यायचे. मागे दुष्काळी दौर्यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण मराठवाड्यात केवळ एक पत्रकार परिषद घेतली. इतरत्र ते कुठेही पत्रकारांशी बोलले नाहीत, का तर पत्रकार प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणारे पत्रकार त्यांना आवडत नाहीत. पुर्वीची लिडरशीप अशी नव्हती.
सध्या तर तालुका पातळवरच्या नेत्यांनीही स्वत:चा मिडीया डेव्हलप केला आहे. वर्तमान पत्रांना जाहिराती देणार नाहीत मात्र स्वत:च्या मिडीयावर लाखो रूपये खर्च करतील. हा वयक्तीक मिडीया बातम्या तयार करतो अन् अन् सोशल मिडीयावर व्हायरल करून झाल्यास वर्तमान पत्रांनाही ती बातमी पाठवतो. गरज असेल तर छाप अथवा छापू नका असे त्यांचे धोरण असते. यामुळे नेते आणि पत्रकार यांच्यातला संवाद तुटला आहे. गोंधळी वातावरण आहे, कोणाचाच कोणावर विश्वास नाही. जुणे नेते ऑफ दि रेकॉर्ड बरच काही सांगायचे मात्र पत्रकार ते छापत नसत. सध्या मात्र ऑफ दि रेकॉर्ड सांगीतलेल्या गोष्टीही पत्रकार छापतात. पत्रकारांनी देखील ऑफ दि रेकॉडे सांगीतलेल्या गोष्टी छापल्या ना पाहिजेत. टाकलेला विश्वास जपला पाहिजे.
प्रश्न : पत्रकार वसंत मुंडे यांच्या मागे प्रेरणा कोणाची आहे?
उत्तर : माझ्या मागे माझ्या आईची प्रेरणा आहे. ती शिकलेली नसली तरी मला शिकण्याची आणि मी जे काही करेल त्याला प्रोत्साहन देत प्रेरणा देण्याचे काम माझ्या आईने केले. आयुष्यात अनेक लोक भेटले, त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. बातमीसाठी मी ज्याच्याकडे गेलो तो देखील माझी प्रेरणा होता. बातमीसाठी गेलेल्या शेतकरी, ऊसतोड काम यांनी देखील मला प्रेरणाच दिली. मात्र माझी खरी प्रेरणा दिली ती माझ्या आईने.
======================














