नाशिक/जळगाव (प्रतिनिधी): दीड महिन्यापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तीन वर्षांच्या दोन जुळ्या मुलांना सांभाळायचे कसे या विवंचनेतून पतीनेही आपल्या दोन मुलांसह खाणीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सय्यदपिंप्री येथे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर गुलाब महाजन (३४) आणि पृथ्वी व प्रगती (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
यावल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले शंकर गुलाब महाजन (वय-३४) हे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्याला होते. कोरोना काळात दोघांची नोकरी गेली होती. तेव्हापासून शंकर हे मिळेल त्या ठिकाणी बदली चालक म्हणून काम करीत होते.दीड महिन्यांपूर्वी पत्नीने आत्महत्या केली होती.
दरम्यान, सय्यदपिंप्री शिवारात बुधवारी सकाळी खदान परिसरात पाण्यावर तीन मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. काही अंतरावर दुचाकी, आणि चप्पल पडलेल्या आढळून आल्या. मृताजवळ असलेल्या आधारकार्डच्या आधारे तपास केला असता शंकर महाजन (रा. भगतसिंगनगर, ओझर) यांचा आणि त्यांच्या दोन जुळ्या मुलांचे ते मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता मयत हे यावल (जळगाव) येथील रहिवासी होते. सध्या ते ओझर येथे वास्तव्यास होते. वरिष्ठ निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.