जळगाव : आज केंद्रीय नागरी वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जळगावातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन ना. नितीन गडकरी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील रस्त्याचे दुहेरीकरण करण्यात आले असले तरी यामुळे वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करून यात गिरणा पुलापासून ते थेट तरसोद फाट्यापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वर्दळीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्यांचे विस्तारीकरण करण्यात यावे अशी मागणी देखील यात करण्यात आलेली आहे.
यावेळी यासोबत जिल्ह्यातील इतर महत्वाच्या मार्गांचे काम देखील ना. गडकरी यांनी मार्गी लावावे अशी अपेक्षा सुध्दा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. या सर्व कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत १४०० कोटी रूपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पाळधी बायपास येथे खेडी-कढोली रस्त्यासाठी अंडरपास निर्माण करावा तसेच पाळधी ते पोखरी तांडा येथे जाण्यासाठी सुध्दा अंडरपास निर्मित करण्यात यावा अशी मागणी सुध्दा यात करण्यात आलेली आहे. यासोबत भुसावळ ते अजिंठा लेणी हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. यातील भुसावळ ते जामनेर हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ४४ असा आहे. तर जळगाव ते औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने भुसावळ ते जामनेर रस्त्याचे काम करता येत नाही. यामुळे या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.














