जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना देशातील १० सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे ९ जिल्हे असून यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त होतं आहे.
चिंता वाढली….
महाराष्ट्र शासनासोबत केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातल्या कोरोना संसर्ग वाढत असल्याची माहिती दिली.
हे आहेत नऊ जिल्हे…
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील ९ जिल्हे असल्याचा उल्लेख केला.यात महाराष्ट्रातील पुणे,नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव व अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले आहेत. नंतर सातव्या स्थानी बंगळुरू शहरचा क्रमांक लागतो. नंतर पुन्हा आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर महाराष्ट्रातले जिल्हे आहेत.
निर्बंध अधिक कडक होणार…
राज्यात कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यामुळे आरोग्य यंत्रनेवर कमालीचा ताण आला आहे. शासन कोरोनाला नियंत्रणात आणण्याकरिता सर्व प्रयत्न करतांनाचे चित्र दिसत आहे तरी देखील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जनता कर्फ्यू देखील फारसा प्रभावी ठरत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने यापुढील काळात निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहे.















