अहमदनगर – राज्यातील सत्तेचा विषय आता संपला असून आता नगरकरांसोबत राज्यातील नेत्यांच्या नजरा नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीकडे आहेत. 21 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदेत नव्या अध्यक्षांसह अन्य पाच प्रमुख पदाधिकार्यांच्या निवडी होणार असून या ठिकाणी देखील राज्यातील महाआघाडीचा फॉम्युला कायम राहणार की विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या सत्ता राखण्यात यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, काहीही झाले तरी नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत कायद्याचा किस निघणार हे नक्की आहे.
राज्यात सत्ता समिकरणे बदलल्याने त्याचे पडसाद नगर जिल्हा परिषदेत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत नव्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार की विद्यमान अध्यक्षा विखे यांच्या रुपाने भाजपचा झेंडा रोवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याबरोबर भाजपमधून देखील काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेच्या संख्याबळात बदल झाला आहे. तांत्रिकद़ृष्ट्या हे सदस्य आजही मुळ पक्षात असले तरी मनाने आणि त्यांचे नेत मात्र ते नव्या पक्षात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारली. 12 जागांपैकी सहा जागा मिळविल्या तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.
त्यात राज्यात देखील सत्ता समिकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडी आता सत्तारुढ झाली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीमुळे जिल्हा परिषदेत आता राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळून शकते. 2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे संख्याबळ होते. राष्ट्रवादीचे 19, मूळ काँग्रेसचे 10 व शिवसेना 7 तसेच शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे समिकरण जुळू शकते. काँग्रेसचे 23 सदस्य असले तरी विखे पाटील यांच्या गटाला मानणारे 13 सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी 37 सदस्यांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे.
राज्यात ज्या प्रमाणे महाविकासआघाडीचे घटक पक्ष एकत्र आलेले आहेत. तोच प्रयोग नगर जिल्ह्यात झाल्यास या ठिकाणी विखे यांना सत्तेपासून रोखणे शक्य आहे. मात्र, 2007 च्या निवडणुकीचा अनुभव पाहता जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी विखे गट कोणताही प्रयोग करून शकतात. या शिवाय झेडपीतील संभाव्य महाविकासआघाडीत आज सर्वात मोठा राष्ट्रवादी असून राष्ट्रवादीकडून घुले, जगताप आणि ढाकणे हे स्पर्धेत राहू शकतात. मात्र, विखे गटाच्या विरोधात कोण दंड थोपटील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. यापूर्वीच्या 10 ते 15 वर्षांतील जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा विचार केल्यास शिवसेनेचे सदस्य नेहमीच विखे गटासोबत राहिलेले आहेत. यामुळे यंदा देखील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये नगर जिल्हा परिषदेतील राजकारणात कायद्याचा किस निघालेला असून यंदा देखील त्याला अपवाद ठरणार नसल्याचे दिसत आहे.













