परळी – गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून भाजपचे महाराष्ट्रात मजबूत स्थान निर्माण केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांचे मुख्यमंत्री झाले. तरी देखील स्मारक पूर्ण झाले नसल्याचे सांगत खडसे यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले.
आज, गोपिनाथ मुंडे यांची आठवण आल्यानंतर भावूक होतो. आज पुन्हा संघर्षाचा काळ आयुष्यात आला आहे. मात्र, साथ देण्यासाठी गोपिनाथ मुंडेसोबत नाहीत याची खंत वाटत असल्याचे खडसे यांनी सांगितले. पंकजा मुंडे या निवडणुकीत पराभूत झाली याचे दु:ख आहे. मात्र, पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून त्यांचा पराभव घडवून आणला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. माझ्यावर पक्षातल्या लोकांनी आरोप केले. माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खडसे यांनी म्हटले. संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत: ला एकटे समजू नये. आम्ही सर्व त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी खडसे यांनी दिली.