नवी दिल्ली – महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा देशभक्त म्हणून उल्लेख केल्याप्रकरणी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी आज लोकसभेत माफी मागितली. ‘राष्ट्राच्या उभारणीत महात्मा गांधी यांनी दिलेल्या योगदानाचा मी आदर करते. लोकसभेत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. तरीही माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते,’ असं साध्वी म्हणाल्या.
संसदेत विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयकावर चर्चा सुरू असताना द्रमुकचे सदस्य ए. राजा हे गोडसेने गांधीजींची हत्या का केली यावर भाष्य करत होते. गोडसेचा एका विशिष्ट तत्त्वाज्ञानावर विश्वास होता. आपण तब्बल ३२ वर्षे गांधीजींचा द्वेश करत होतो व त्यामुळेच अखेर त्यांच्या हत्येचा निर्णय घेतला, असे त्याने स्वत: कबूल केले आहे, असे राजा म्हणाले. त्यावेळी प्रज्ञा ठाकूर मध्येच उभ्या राहिल्या व त्यांनी ‘तुम्ही देशभक्तांचे उदाहरण देऊ नका’ असे म्हणाल्या. त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रज्ञा यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घातला.














