मुंबई: भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.
आपले आमदार फुटतील असा विचार करून आपल्याच आमदारांवर अविश्वास दाखवणे हे अयोग्य असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला आहे. शिवसेनेच्या आमदारांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांचा सत्यावर विश्वास आहे. तेव्हा असे एकनिष्ठ आमदार कधीही फुटणार नाहीत. आमदारांना अशा प्रकारे एका ठिकाणी ठेवणे हे अयोग्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. भाजपचा आमदार विकाऊ नाही आणि भाजपच्या आमदारांना विकत घेण्याची कुणाची हिम्मतही नाही, आमचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे, असे सांगत सर्व पक्षांचा आपल्या आमदारांवर विश्वास असला पाहिजे असे मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
कोंडी फुटेल असा विश्वास
दरम्यान, शिवेसनेचा मु्ख्यमंत्रिपदाबाबतचा आपला आग्रह कायम असून ही कोंडी फुटेल असा आपल्याला विश्वास असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या महायुतीला सत्ता स्थापनेचा जनादेश दिला आहे. आम्ही जनादेशाचा आदर करतो, असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून हेच सांगत आलो आहोत, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.















