मुंबई – अधिवेशन काळात सर्व आमदारांनी दररोज सभागृहात उपस्थित रहायला हवे, कामकाजादरम्यान सरकारला अडचणीत आणणारे कोणतेही वक्तव्य करू नये, अशी तंबी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत दिल्याचे कळते. तसेच विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायचे संकेतही मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये जोश होता.
अधिवेशनाचे कामकाज सोमवारी लवकर संपल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास तीन आठवडे चालणार असून, अधिवेशन काळात सर्व आमदारांनी उपस्थित राहून कामकाजात सहभाग घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्याचे कळते. विरोधक सरकारच्या विरोधात काही ना काही आरोप करीत असले तरी त्यांचे आरोप खोडून काढण्याचे काम आम्ही सभागृहात चोख बजावू, मात्र सरकार अडचणीत येईल, असे कोणतेही वक्तव्य आमदारांनी कामकाजादरम्यान करू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावल्याचे कळते. महाविकास आघाडीत तीन पक्ष असले तरी मंत्र्यांनी आपापल्या पक्षाचे म्हणून काम करू नये. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराच्या कामांबाबत मंत्र्यांनी तत्परता दाखवायला हवी. आमदारांच्या पायावरच ही आघाडी उभी आहे, याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दिली. तसेच त्यांच्या या भूमिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांचीच भूमिका पुढे नेत, आमदारांना सभागृहात हजर राहण्याच्या सूचना केल्याचे कळते. तर, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही, सभागृहात रोजच्या रोज हजर राहून प्रश्न, लक्षवेधी या आयुधांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा, असे आमदारांना सांगितल्याचे कळते.















