जामनेर : – तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये आणखी वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जवाहर विहीरी अंतर्गत योजनेतुन सुमारे तीन हजारावर विहिरी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परीषदेत दिली.
जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री यांनी आपल्या निवास स्थानी रात्री उशीरा पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे जेष्ठनेते जगन्नाथ चव्हाण जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. लाभार्थी निवड अंत्यंत पारदर्शीपणे करण्यात येऊन कोणताही भ्रष्टाचार यात खपवुन घेतला जाणार नाही,जामनेर तालुक्यातील गरजु आणि सिंचनाची आवश्यकता असणाऱ्यांना यामध्ये प्राधान्य राहणार असुन,कोणीही दलाल यात दिसता कामा नये, लाभार्थ्याकडुन कोणी पैसे घेऊ नये,पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीरसह आवश्यक सर्व प्रकारची कारवाई आपण करणार असून बऱ्याचदा अशा योजनांमध्ये काही ठिकाणी लाभार्थ्याकडुन मध्यस्त-दलालांनी पैसे घेतल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे विहिरींचे पारदर्शीपणे वाटप होणार असल्याचेही यावेळी मंत्री महाजन यांनी सांगीतले. याप्रसंगी पालक मंत्र्यांनी टेक्स्टाईल पार्कच्या जमीन संपादना विषयी सांगीतले की परीसरातील बहुतांश शेतकऱ्यांची संमंती असली तरी त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे कोरडवाहु क्षेत्राला हेक्टरी २५ लाख,तर बागायती क्षेत्राला ३७ लाख रूपये प्रती हेक्टरी शासनाच्या वाढीव दर आणी नियमाप्रमाणे मोबदला देण्याचे ठरलेले आहे.यामध्ये कुठलाही वाद नाही,त्यामुळे लवकरच टेक्स्टाईलपार्क पुर्णत्वास येण्यास कोणताही अडथळा नाही.सर्वांना रोजगार आणी शेतकऱ्यांच्या कपाशीला चांगला भाव टेक्स्टाईल पार्कच्या पुर्ण होण्यामुळे मिळणार असल्याचा विश्वासही पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला.