जळगाव, दि.१८ – जळगावातील व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. संशयीत आरोपी विनोद पंजाबराव देशमुख याला जिल्हा सत्र न्यायालय (वर्ग-१) व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळला असूनही आजवर अटक करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील पोलिसांवर दबाव असल्याचे गंभीर आरोप मनोज वाणी यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेत मनोज वाणी यांनी दस्ताऐवज दाखवत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले असून दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी देशमुख व इतरांनी रामदास कॉलनीतील कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकला, जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शहर पोलीस व जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात दरोडा, फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, लैंगिक अत्याचार, कटकारस्थान यांसह आयपीसीची गंभीर कलमे दाखल आहेत. तरीही संशयीत आरोपी मोकाट फिरतोय, लोकांना धमकावत आहे व व्हॉट्सॲप गटांमधून भडकावू संदेश पसरवत असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्ता म्हणून दबाव
मनोज वाणी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, संशयीत आरोपी देशमुख स्वतःला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिवलग कार्यकर्ता असल्याचे सांगतो. पोलिसांपासून ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत अधिकाऱ्यांना अजित पवारांच्या सहाय्यकांच्या नावाने फोन करून दबाव आणतो. एवढेच नव्हे, तर तो उघडपणे “मी एसपींसोबत बसतो, अजितदादांसोबत उभा असतो; मला कोणी अटक करू शकत नाही” असे सांगून कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देतो, असे ते म्हणाले.
न्यायालयीन आदेश केवळ कागदावर?
मनोज वाणी यांनी दस्ताऐवज दाखवून सांगितले की, दि.२८ एप्रिल २०२५ रोजी उच्च न्यायालयाने रामानंदनगर पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षकांना आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले व त्यांचे प्रतिज्ञापत्र नोंदवले. तरीही आरोपीला अटक न होता तो उघडपणे फिरतोय. रामानंदनगर पोलिसांनी आरोपीला फरार घोषित केले, पण ही कारवाई केवळ कागदापुरती राहिली आहे. विनोद देशमुख गावात बिनधास्त फिरतो, अजित पवारांच्या सभेला उपस्थित असतो तरीही पोलिसांना दिसत नाही, असा आरोप मनोज वाणी यांनी केला आहे.
पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव
मनोज वाणींचे म्हणणे आहे की, माझ्यावर दाखल झालेल्या प्रकरणांत पोलिसांनी तात्काळ अटक करून चार्जशीट दाखल केली. पण देशमुखावरील गंभीर प्रकरणांत मात्र विलंब व ढिलाई होत आहे. हे सर्व म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अपमान असून न्याय दिरंगाई म्हणजे न्याय नाकारणे आहे. पोलीस प्रशासन न्यायालयाचा अवमान करत असून हे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
विनोद देशमुख यांच्यावर फसवणूक आणि चोरीचे गुन्हे दाखल असून, उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असतानाही, पोलीस त्यांना अटक करत नाहीत. यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनोज वाणी यांनी आपल्यावर राजकीय दबावातून अवैध सावकारीचा खोटा आरोप लावल्याचेही पत्रात म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असून, त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या गंभीर आरोपांची तात्काळ दखल घेऊन, पोलीस प्रशासनाने कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मनोज वाणी यांच्या ‘या’ आहेत मागण्या
१. संशयीत आरोपी विनोद देशमुख याला तात्काळ अटक करावी.
२. दाखल सर्व प्रकरणांचा निष्पक्ष तपास व्हावा.
३. अर्जदार व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी मिळावी.
४. राजकीय दबाव थांबवून न्यायालयीन आदेशांना अंमलात आणावे.