मुंबई- मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त होणार आहे. जीव्हीकेने सोमवारी ही घोषणा केली. ’विमानतळावर सर्व एकल वापराच्या प्लास्टिकविरोधात प्लास्टिक उत्पादनांना बंदी असेल. यात थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (200 एमएलपेक्षा कमी), प्लास्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या), स्ट्रॉ, थर्मोकोल आयटम्स आणि बबल रॅपचा समावेश आहे.’ अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली. याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.
दरम्यान, पालिकेनेही नागरिकांना प्लास्किटमुक्तीचे आवाहन केले आहे. नियमभंग करणार्यांवर पाच हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई किंवा तीन महिने कैद आणि 25 हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. ’सर्व नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक जवळच्या संकलन केंद्रात जमा करायचे आहे,’ असं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.
देशभरातील 129 विमानतळ ’प्लास्टिकमुक्त’ करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला होता. त्यापैकी 35 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोहिमेपासून दूरच होते.
गांधीजयंतीपासून देशात प्लास्टिकबंदी?-
एएआयच्या ताब्यात जवळपास 135 विमानतळ आहेत. या विमानतळांचा प्रदूषण अभ्यास जानेवारी महिन्यात करण्यात आला. त्याआधारे सध्या कार्यरत असलेल्या 129 विमानतळांवर प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत केवळ एकदा वापरात येणार्या प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पेले, पिशव्या आदींवर विमानतळ परिसरात बंदी घालण्यात आली. पहिल्या टप्प्यात 15 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली.
प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय एएआयने त्यांच्या अखत्यारित असलेल्या विमानतळांबाबत घेतला आहे. पण मुंबई विमानतळाची मालकी जीव्हीके समूहाकडे आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. तसे असले, तरी एएआयने प्लास्टिकबंदी केलेल्या 35 विमानतळांमध्ये राज्यातील पुणे, गोंदिया, औरंगाबाद येथील विमानतळांचा समावेश आहे.
पंतप्रधानांचे आवाहन-
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून दोन ऑक्टोबरपासून पर्यावरणाची हानी करणार्या प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधताना पंतप्रधान मोदी यांनी केले होते. प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या थैल्या वापरण्याचा सल्ला त्यांनी दुकानदारांना दिला होता.
सिक्कीम अग्रेसर-
भारतात प्लास्टिक बंदीचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले असून ते यशस्वी होऊ शकलेले नाही. 1998 साली सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. ती कमालीची यशस्वी ठरली असून प्लास्टिकचा अजिबात वापर न करणारे सिक्कीम हे भारतातील आदर्श राज्य ठरले आहे. मात्र, अन्य राज्यांना सिक्कीमचे अनुकरण करणे शक्य झालेले नाही.