जळगाव, (विशेष प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरातील एका तरुणाने थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चार दिवसा पासून घरात खायला नसल्याने उपासमार होत असल्याची तक्रार केली होती.या तरुणाच्या तक्रारीची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेत जिल्हा पुरवठा कार्यालयाला कळविले होते.या नुसार जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जळगाव तहसीलदार यांना तात्काळ त्या तरुणाच्या घरी जाऊन चौकशीच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान तहसीलदार, जळगाव यांनी प्रिंप्राळा परिसरात त्या तरुणाच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्या तरुणाने व त्याच्या पत्नीने घरात खायला काहीच नसल्याचे सांगितले.यावेळी घरात मात्र चैनीच्या वस्तू जसे की, फ्रीज, कुलर,टीव्ही, मोबाईल अशा वस्तू आढळून देखील आल्या मात्र या दाम्पत्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू नसल्याचे दिसून आले.त्या दाम्पत्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी प्रेम विवाह केला असून ते दोघेच या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाली.परिस्थिती लक्षात घेऊन अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक महिना भराचा किराणा या दाम्पत्याला देण्यात आला आहे.तसेच जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल सादर केला आहे.जिल्हा प्रशासनाने या दाम्पत्याला तात्काळ मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले तर प्रशासनाच्या तत्परते बद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.