जळगाव दि.5 (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी वरदान ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील 9 केंद्रासह व मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास 925 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात ही योजना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन राबवित आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी होय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली.
कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जळगाव जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. तसेच शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वाढविण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात ही योजना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन राबवित आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ही योजना जळगाव शहरात 9 ठिकाणी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात ही योजना राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुक्ताईनगरला ही योजना सुरू होत असून याठिकाणी 150 थाळी वाटप करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात 925 थाळी वाटप केल्या जात आहे.