कोपरगाव-(प्रतिनिधी) जगभरासह देशांत व राज्यात कोरोना विषाणूच्या साथीने कहर केलेल्या काळात एकमेकाला मदत करण्यासाठी फार दुर्मिळ उदाहरणे असताना कोपरगाव शहरात तीन पिढ्या भाजीपाला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जेऊर पाटोदा येथील रहिवाशी महिला व भाजीपाला व्यापारी सखुबाई अशोक जाधव (वय-६५) यांनी मुख्यमंत्री आपत्कालीन निधीसाठी पै-पै पैशातून साठवलेल्या आपल्या कमरेच्या कडसुरीतून तब्बल ५१ हजारांचा निधी नुकताच कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी प्रश्नात सरोदे यांचेकडे सुपूर्त केल्याने त्यांच्या या धर्मदाय वृत्तीचे समाजाच्या सर्वच नागरिकांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात,कोरोना व तत्सम अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.वर्तमानस्थितीत कोरोना विषाणूच्या साथीने जगात कहर उडवून दिला असून आजपर्यंत देशात ३५८८ लोकांना लागण झाली असून ९९ जणांचा मृत्यू झाला आहे.या मुळे देशात परिस्थितीत नियंत्रणात असली तरी अमेरिका इटली,स्पेन सह जगात मात्र फारच नाजूक परिस्थिती उद्भवली आहे.या पार्श्वभूमीवर शासन आपल्या परीने संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करीत आहेच पण नागरिकांनी एकजूट दाखवत आपल्या आर्थिक दुर्बल बांधवांना मदतीचा हात देणे फार गरजेचे बनलेले आहे.अनेक दानशूर वा उद्योजक आदींनी या साठी पुढाकार घेतला आहेच तो त्यांच्याठायी मोठा गुण आहेच पण ज्यांची सायंकाळची चूल पेटायची भ्रांत त्यांनी या यज्ञात उडी घेणे कौतुकास्पद नव्हे का ? या पार्श्वभूमीवर जेऊर पाटोदा येथील रहिवाशी व कोपरगाव येथील भाजीपाला व्यापारी सखुबाई जाधव यांचे दातृत्व नक्कीच उठून दिसणारे आहे.पती अशोक जाधव व मुले गणेश जाधव,मनोज जाधव, संदीप जाधव तीन मुले हे आपला व्यवसाय सांभाळत असून त्यात त्यांच्या आतापर्यंत तीन पिढ्या खपल्या आहेत.या प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी आपले सामाजिक दायित्व जपले आहे.त्यांच्या या दातृत्वाचे कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,कोपरगाव नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,कोपरगाव नगरपरिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी सखुबाई जाधव यांच्या या उपक्रमाचे टाळ्या वाजवून स्वागत केले आहे.