जळगाव – शहरातील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वातावरण शुद्धीसाठी सूर्यास्ताला अग्निहोत्र करण्यात आले, असे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. कृषी अधिकारी कार्यालयाचा वापर अग्निहोत्र होमसाठी करणे हेच मुळात आक्षेपार्ह आहे. एखाद्या धार्मिक विधीचा वापर सरकारी कार्यालये जर करीत असतील तर त्यावर जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जळगाव आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अग्निहोत्र होम पद्धत अवैज्ञानिक आहे. अग्निहोत्र सिध्द सायन्स असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा शास्त्राचे सर्व नियम, निकष, कसोटी पूर्ण केल्या पाहिजेत. भारतीय राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. असे असूनही सरकारी कार्यालयात धार्मिक विधी करणे हे चुकीचे व घटनाद्रोही आहे. विदेशी नागरिकांनी अग्निहोत्र केले म्हणजे काहीतरी अद्भुत आहे असे अजिबात नाही.
अग्निहोत्र थेरपीत चुंबकीय उर्जा निर्माण होते असा दावा केला जातो, तर ते वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करावे लागेल, हे आव्हान स्विकारावे. दुसरा दावा आहे प्रदुषण नियंत्रण होते. कोणतेही कार्बनी व सेंद्रिय पदार्थांच्या ज्वलनाने आक्सिजन वायुचा वापर करून कार्बन डाय ऑक्साईड,कार्बन मोनाॅक्साईड व इतर प्राणघातक आॅक्साईड यासारखे वायु बाहेर टाकले जातात. प्रदुषण कमी होण्यापेक्षा प्रदुषण वाढते. हे सहज सिद्ध सायन्स नसून हेच विज्ञान शाळा महाविद्यालयात शिकवले जाते.
तिसरा दावा आहे नकारात्मक उर्जा निष्क्रीय होऊन सकारात्मक उर्जा वाढते. आता आमच्यासारखे अग्निहोत्र होमसाठी नकारात्मक भूमिका आहे, तर ती सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वाट कशाला पहावी? चवथा दावा आहे रेडीओअॅक्टीव्ह नकारात्मक कणांना निष्क्रीय करणे. रेडीओअॅक्टीव्ह कण कोणते, त्यांचा उल्लेख नाही .जर ते निष्क्रीय होत असेल तर वैज्ञानिकांसमोर ते सिद्ध व्हावे लागेल. पाचवा दावा आहे की, आरोग्यदायी, आनंदी जीवन व ताणतणाव रहीत जगण्यासाठी अग्निहोत्र उपयुक्त आहे. शरिरशास्राचे नियम पाळल्यास आरोग्य सांभाळणे सुलभ होते. जीवनाचे ताणतणाव दूर होण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आहेतच. अग्निहोत्र उपचार पद्धती शास्त्रीय असु शकत नाही.
सहावा दावा आहे की, मंत्रोच्चाराने दम्याचा आजार बरा झाला. जर हे सत्य असेल तर भारतात सर्वात जास्त मृत्यू दम्यासारख्या टी.बी.या रोगाने होतात.मेडिकल सायन्स यांनी ही प्रचिती सार्वत्रीक कां करु नये? असा सवाल महाराष्ट्र अंनिसतर्फे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, अशोक तायडे, मोहन मेढे, आर.वाय.चौधरी यांनी तर मराठी विज्ञान परिषदेतर्फे सचिव प्रा.दिलीप भारंबे, प्रा.आर.ए.पाटील आदींनी विचारला आहे.