पोलीस अधीक्षकांची कारवाई
जळगाव – अवैध व्यवसाय करणार्या लोकांच्या संपर्कात राहणे, आक्षेपार्ह बोलणे या कारणांमुळे रामानंदनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रदीप चौधरी, शरद पाटील व उमेश साळुंखे या तीन तसेच जळगाव शहर वाहतूक शाखेचे गणेश प्रभाकर लाठे या चार कर्मचार्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली.डॉ. पंजाबराव उगले यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश पारीत केले आहे. तत्पूर्वी सोमवारी मेहरुणबारे पोलिस ठाण्याचे गोरख चकोर व चाळीसगाव उपविभागीय कार्यालयातील संतोष पाटील यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. कारवाईने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यातच कार्यरत कर्मचारी प्रदिप अनंदा चौधरी, उमेश राजेंद्र साळूखे, शरद अभिमन्यु पाटिल अशा तीन कर्मचार्यांना नियंत्रण कक्षात सलग्न(कंट्रोल जमा) करण्याचे आदेश पारित केले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ई-मेल प्राप्त होताच तीन्ही कर्मचार्यांना निरीक्षक अनिल बडगुजर यांनी रात्रीच नियंत्रणकक्षासाठी रवाना केले.
अवैध दारु, सट्टा, वाळु वाहतूक करणार्यांच्या संपर्कात राहुन काही पोलिस कर्मचारी ‘हप्ते’ गोळा करीत असल्याच्या अनेक तक्रारी वरीष्ट अधिकार्यांना प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात काही गोपनीय अहवाल देखील पोलिस अधिक्षकांना प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी स्वतंत्र पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती. चौकशीअंती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलीस अधीक्षकांनी पुन्हा जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांना अवैध धंद्याशी संबंधित कुठल्याही कर्मचार्यांशी गय नाही, असा संदेश दिला आहे. 20 दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तिघांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.