- एक लाख उद्योजक घडवण्याचे उद्दीष्ट
ज़ळगाव – प्रतिनिधी : स्वावलंबन संकल्प अभियान
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्वावलंबन संकल्प’ अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देशात ३० कार्यक्रमांचे आयोजन सिडबी, एससी एसटी हब आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डिक्की ) च्या वतीने करण्यात आले आहे.
‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेच्या माध्यमातून देशात अनुसूचित जाती – जमाती मधून एक लाख पंचवीस हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिद्ष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी गेल्या तीन वर्षात २० हजार उद्योजक निर्माण झाले आहेत व बँकांनी ३,३८४ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज दिले आहे.
‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेची मुदत २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात देशात एक लाख पाच हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिद्ष्ट आहे. त्यासाठी सिडबी, एससी एसटी हब, भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी उद्योगाच्या सहाय्याने डिक्कीने कार्ययोजना बनविली आहे. ती अनुसूचित जाती व जमातीच्या होतकरू तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा देशातील सर्वाधिक इंडस्ट्री आणि बँकांच्या शाखा असलेला जिल्हा आहे. या योजनेला पुण्यात चांगला प्रतिसाद असला तरी उद्दिष्टापासून लांब आहे. त्यामुळे डिक्कीने पुढाकार घेऊन दि. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे स्टेशन जवळ अल्पबचत सांस्कृतिक भवन मध्ये स. १०.०० ते सायं ५.०० या वेळेत ‘स्वावलंबन संकल्प अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात होतकरू तरुण तरुणींना विविध व्यवसायांच्या संधीबद्दल मार्गदर्शन होईल. तसेच भारत सरकारच्या विविध सार्वजनिक उपक्रमांचे सादरीकरण होईल, तसेच आयडीया गॅलरी ही उपलब्ध असेल. ज्याचा तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ घेता येईल.
या कार्यक्रमास डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील इच्छुक तरुण तरुणींनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन डिक्कीच्या वतीने मराठवाडा समन्वयक प्रफुल्ल पंडीत, परभणी जिल्हा समन्वयक प्रफुल्ल पैठणे,प्रकाश साळवे यांनी केले आहे.