नवी दिल्लीः – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकार (LIC) चा मोठा हिस्सा विकणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितले. केंद्र सरकार एलआयसीचे आयपीओ आणणार असून या अंतर्गत एलआयसीमधील मोठा समभाग विकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सभागृहाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणतात की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहेत. आज सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. उद्योगांना तात्काळ चांगली स्थिती आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. हा अर्थसंकल्प अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्व महिला आणि अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे काम करणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मुळे एका कुटुंबातील व्यक्तींना चार टक्के महिन्याचा खर्च वाचवण्यास मदत होत आहे. तसेच या प्रणालीत ६० लाख नवीन करदाते जोडले गेले आहेत. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात येत आहे.