नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० या काळात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठीचा संघ आज जाहीर केला. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे दिले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना सिडनीत २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा सामना २४ फेब्रुवारी रोजी बांगालदेशविरुद्ध पर्थ येथे होणार आहे. तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न येथे २७ रोजी खेळवला जाईल.
साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध २९ फेब्रुवारी रोजी मेलबर्नमध्ये होईल. साखळी फेरीनंतर ए आणि बी ग्रुपमधील टॉप संघ सेमीफायनलमध्ये खेळतील. दोन्ही सेमीफायनल ५ मार्चला मेलबर्न मैदानावर तर फायनल लढत ८ मार्च रोजी मेलबर्नवरच होईल.