मुंबई – मरगळलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी भारतीय स्टेट बँक सरसावली आहे. ‘एसबीआय’ने गुरुवारी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या योजनेची घोषणा केली आहे. निर्माणाधीन (under construction) गृह प्रकल्पांत घर खरेदी करणाऱ्या कर्जदाराला निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळाला नाही तर कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे बँकेने जाहीर केले आहे.
‘रेसिडेंशिअल बिल्डर फायनान्स विथ बायर ग्यारंटी स्कीम’ या योजनेत पहिल्यांदाच ग्राहकांना गृहकर्जावर सुरक्षा दिली जाणार आहे. घराची किंमत जास्तीत जास्त २.५ कोटी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना ही योजना लागू होईल. या योजनेत आवश्यक अटी आणि शर्थींची पूर्तता करणाऱ्या बिल्डरलासुद्धा ‘एसबीआय’ ५० ते ४०० कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीचा प्रभाव आणि बुडीत कर्जे लक्षात घेत बँकेने या क्षेत्रात सकारात्मकता आणण्यासाठी ही नवीन योजना तयार केली आहे. यात निर्माणाधीन प्रकल्पात अडकलेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल, असे ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.