मुंबई – सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आज पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतल्याने कामगार संघटनांचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, देना बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक यासारख्या सरकारी बँकांचे कामकाज आज ठप्प झाले. बहुतांश बँकांच्या शाखांचे कामकाज सुरु होऊ शकले नाही.
आजच्या भारत बंदमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, बँक कर्मचारी सेना महासंघ आदी १० कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. यामुळे पैसे भरणे, पैसे काढणे, चेक वटवणे आदी दैनंदिन बँक व्यवहार करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. सकाळपासून आझाद मैदानात शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. बहुतांश सरकारी बँकांनी आपल्या शाखांमध्ये भारत बंदबाबत ग्राहकांना सूचित केले आहे. याशिवाय देशभरात पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये भारत बंदचा प्रभाव दिसून आला.
मुंबईत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करत बंदमध्ये सहभाग घेतला. भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. भारतीय आयुर्विमा मंडळाच्या मुंबईतील बहुतांश कार्यालयातील कामकाजावर बंदचा परिणाम दिसून आला.