मुंबई – विविध कामगार संघटनांनी बुधवारी ८ जानेवारी रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मात्र संपाने बँक शाखा ठप्प झाल्या तरी इतर पर्यायातून बँकिंग कामे उरकता येऊ शकतात.
भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यामधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. आॅल इंडिया बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार सहा बँक युनियन्स उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होत असून यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल. बँक शाखा आणि एटीम सेवेला भारत बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान एक दोन अपवाद वगळल्यास खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.
भारत बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे ‘एसबीआय’ने म्हटलं आहे. भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या बँक कर्मचारी संघटनांमध्ये ‘एसबीआय’च्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असा दावा ‘एसबीआय’ने केला आहे.