एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
उन्हाळी पिकांची काढणी सुरु
२ ते ७ एप्रिल यादरम्यान ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा देखील अंदाज आहे. संपूर्ण आठवडाभर अशीच स्थिती राहणार आहे. पावसासोबतच वादळी वाऱ्याचाही अंदाज असल्याने केळीचे नुकसान होण्याची भीती आहे. तर मका, हरभरा, ज्वारी, दादरची काढणी शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागू शकते.
काय म्हणतात हवामान तज्ज्ञ
दक्षिण भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अद्याप उत्तर महाराष्ट्रात समुद्राकडील वारे सक्रिय झालेले नाहीत. सध्या जयपूर, कोटा मार्गे येणारे उष्ण वारे सक्रिय आहेत. १ एप्रिलनंतर महाराष्ट्रात समुद्राकडील बाष्पयुक्त वारे सक्रिय होणार आहेत. त्याच्या परिणामामुळे अवकाळी पावसाचा अंदाज आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात या काळात अवकाळी पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली.