जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपाचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी बंडाचा झेंडा घेत समोर महायुतीचा उमेदवार असतांना विधानसभेला उमेदवारी कायम ठेवत आज पद्मालय देवास्थान येथे गणपती बाप्पाला नारळ फोडून प्रचाराला सुरवात केली यावेळी विधानसभा क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना माजी खासदार ए. टी. पाटील म्हणाले की, मी बंडखोर उमेदवार नसून जनतेचा उमेदवार आहे. एरोंडल – पारोळा मतदार संघाच्या विकासासाठी मला जनतेने आग्रह केला म्हणून मी विधानसभा निवडणुक लढवीत आहे त्यामुळं विकासाच्या व्हिजनवर जनताजनार्दन मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिवर्तन होणार हे निश्चित – माजी खासदार ए. टी. पाटील
गेल्या पाच वर्षात मतदार संघात विकास झाला नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे तसेच विद्यमान आमदार पुत्राला शिवसेने दिलेली उमेदवारी ही राजकारणातील घराणेशाही आता लाेकांना आवडलेली नाही.राजकीय पक्षांना नेत्यांच्या उमेदवारांना तिकिट देताना निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करताेय अशी भावनाही आता निर्माण झाली आहे.त्यामुळं एरोंडल – पारोळा मतदार संघात परिवर्तन होणाचं आणि ते माझ्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निष्ठावान कार्यकर्ता पुढे जाईल अशी भीती वाटते त्यामुळे ते घरातीलच काेणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात? हे सगळे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप. काेणाची बहिण, काेणाचा भाऊ निवडणुकीत उतरलाय. पूर्वी नेत्यांची मुले दादा, भय्या म्हणून मतदारसंघात काम करायचे. वडील निवृत्त झाल्यावर आपल्याल संधी मिळेल का? हे पाहायचे. पण आता नेत्यांनी स्वत: राजकारणात सक्रीय असतानाच कुटुंबातील काेणाला तरी सेट करण्याची नवीन पध्दत सुरू केली आहे.त्यामुळं मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते.









