जळगाव,(प्रतिनिधी)- राजकीय सारीपाटीवरील घडामोडींना जिल्ह्यात वेग आला आहे. रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी व भाजपाचे माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र यांच्यामध्येच आमदाराकीची सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून पहिल्याचं यादीत अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेसने काही महिन्यांपूर्वीचं विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली असल्याने धनंजय चौधरी यांच्या समोर भाजपा कोणता उमेदवार देईल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
दोनही उमेदवार नवखे अन् युवा
जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे निवडणून आलेले एकमेव आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव धंनजय चौधरी यांना काँग्रेस पक्षाने रावेर विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित करून मतदार संघाला युवा चेहरा दिला असतांना भाजपाने देखील युवा चेहरा देत अमोल जावळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. दोनही उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवीत असून दोघांही उमेदवारांना राजकीय वारसा आहे त्यामुळे लढत चूरशीची होणार हे निश्चित.
धनंजय चौधरी यांची जमेची बाजू काय?
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात एकमेव काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी आहेत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असून काँगेस पक्षाची या मतदार संघात पूर्वीपासूनच मोठी ताकत आहे. लग्नसमारंभ, दुःखद प्रसंग, कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात स्वतः हजर राहून शिरीषदादा चौधरी यांनी मतदार संघात चांगली पकड ठेवली आहे.स्व. मधुकरराव चौधरी यांचा राजकीय व शैक्षणिक वारसा सक्षम पणे चालवत असल्याने मतदार संघात वजन आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा असल्याने शांतपणे रणनीती आखली आहे. दरम्यान काँगेस पक्षाने काही महिन्यापूर्वी धनंजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने धनंजय चौधरी यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला, मोठा वेळ मिळाल्याने मतदार संघात गावा गावात पोहचता आलं या दरम्यान मतदार संघात युवा व नवखा उमेदवार धनंजय चौधरी यांनी बऱ्यापैकी निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे त्याचा अपेक्षित परिणाम साधला जाईल त्यामुळे विजयश्री खेचून आणायचा असा त्यांचा निर्धार आहे.
अमोल जावळे यांची जमेची बाजू
अमोल जावळे यांना भजपाच्या पहिल्याचं यादीत उमेदवारी मिळाल्याने मतदार संघात भाजपात गोटात उत्साह आहेचं, स्व. हरिभाऊ जावळे यांनी रावेर लोकसभेचे खासदार, रावेर विधानसभा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतांना मतदार संघात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळं हे अमोल जावळे यांच्या करता फायदेशीर ठरणार आहेत.वडिल हरिभाऊ जावळे यांच्या निधणानंतर अमोल जावळे यांनी मतदार संघातील पदाधिकारी, कारकर्ते व जळगाव जिल्हायतील भाजपाचे नेते यांच्याशी देखील सलोख्याचे संबंध असल्याने भाजपा पुर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात आहे.
दरम्यान महायुतीबाबत जमेची बाजू म्हणजे गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या विविध सरकारी योजनांचा फायदाही होऊ शकतो असा अंदाज आहे.तर, गेल्या 5 वर्षात सत्तेसाठी जे राजकारण करण्यात आलं, भाजपवर वारंवार लागलेले आरोप, 50 खोक्यांवरून माजलेला गोंधळ या सर्वांबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी सुद्धा दिसून येते.
लोकसभेतील निवडणुकीच्या निकालात महायुतीला बसलेल्या फटक्यामुळे या निवडणुकीत सत्ताविरोधी लहरींचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रातही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर, हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल पाहता भाजप जिंकून आली असली तरी मतांचा टक्का बघता आणि महाराष्ट्रातील वातावरण पाहता सत्ताविरोधी लहरींचा परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ, महायुती की मविआ,कोण बाजी मारणार? हे निकाला नंतर कळेलचं.