राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे.दरम्यान कोकणातील चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा केली तर यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मोठी जाहीर सभा झाली. या निमित्ताने खासदार शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी काका – पुतणे एकत्र येणार का ? असा खोचक प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी ‘घरात आम्ही एकत्रच आहोत…’असे मिश्किल शब्दात उत्तर दिले आणि अधिक बोलणे टाळले.मात्र ‘घरात आम्ही एकत्रच….’ असा उच्चार करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या व्यक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
शरद पवार ॲक्शन मोडवर…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शरद पवार यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जावून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवार यांच्याकडून काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारही निश्चित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा पवार गटाकडून केला जातोय. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचे राजकीय फटाकडे तेव्हा फुटण्याची चिन्हं आहेत.
अजितदादा पवारांचा यात्रेतून संवाद
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता राजकारण तापणार आहे.दरम्यान शरद पवारांनापासून राजकारणात फारकत घेत अजितदादा पवार यांनी 2024 पहिलीच लोकसभा निवडणुक लढविली मात्र त्यात फारसे यश लोकसभेला मिळू शकले नाही, केवळ एका जागेवर अजितदादा पवार यांना समाधान मानावे लागले. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी राज्यात शेतकरी संवाद यात्रा, जनसन्मान संवाद यात्रा काढून राज्यातील जनेतेशी संवाद साधला असून पक्षाची बांधणी देखील केली आहे. त्यामुळं ते देखील विधानसभा ताकदीने लढण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येते.
दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत असून या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.काका पुतणे दोन्ही पक्षाच्यावतीने न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे? चिन्हासाठी देखील कायदेशीर मार्गाने लढाई लढली जात आहे. काका-पुतणे राजकारणात परस्परांच्या विरोधात उभे ठाकले येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वानचे लक्ष लागून आहे.