जळगाव,(प्रतिनिधी)– नरेंद्र मोदी यांनी कालच पंतप्रधान पदाची शपथ घेत NDA सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी समोर येत आहे दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळात खा. रक्षा खडसे यांना स्थान मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्याला एकूण चार मंत्री मिळाले आहे.यातच आता राज्यसरकारचा गेल्या अनेक महिन्यांपासून रडखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जळगाव जिल्ह्यातील खास विश्वासू शिलेदार असलेले आमदार किशोरआप्पा पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची दाट शकता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
भाजपा – शिवसेना महायुतीचे शिंदे यांचं सरकार स्थापन झालं तेव्हा देखील आ. किशोरआप्पा पाटील यांचं नावं चर्चेत आलं होतं. पाचोरा – भडगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची जळगाव जिल्ह्यात ओळख आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे दरम्यान आगामी निवडणुकामध्ये विजयाचं गणित या विस्तारातून साधण्यात येईल. आ. किशोरअप्पा पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाते त्यामुळं त्यांना होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाल्यास जळगाव जिल्ह्याला किशोरअप्पा पाटील यांच्या रूपाने पाचवा मंत्री मिळू शकतो.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारसोबत महामंडळाचे देखील वाटप करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका महायुतीला सहन करावा लागला आहे, त्याच अनुषंगाने आगामी निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्यासाठीचा हा महायुतीचा प्रयत्न असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षांना किती मंत्रिपदं मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. राज्यासह देशात आत्ताच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील मित्रपक्षांना कोणाला किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांची माहिती आहे. संदिपान भुमरे हे खासदार झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, अशी शक्यता आहे.