जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे ‘बूथ विजय’ अभियान होणार असल्याची माहिती देत प्रत्येक बूथवर ३७० मते वाढवण्यासाठी निर्धार करणार असल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भाजपा स्थापना दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर भाजपाचे विविध उपक्रम सुरु असून आज जळगाव येथील भाजपा कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी यांनी पत्रकार परिषदेत बूथ विजय अभियान बाबत माहिती दिली. यावेळी सुरेश भोळे(राजूमामा), पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख राधेश्याम चौधरी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सहमुख्य प्रवक्ते श्री अजित चव्हाण, भाजपा प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी यांनी दिली. ते भाजप जळगाव शहर कार्यालय जळगाव येथे ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले.
‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या ६ दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती श्री.अजित चव्हाण व लक्ष्मण सावजी यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषदेत दिली . घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती ही श्री अजित चव्हाण यांनी दिली. भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य , योजना पोहोचवून भाजपा ला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल.
श्री अजित चव्हाण म्हणाले की बूथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स ॲप ग्रूप बनवण्यात येईल .प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा ही होतील असे श्री. अजित चव्हाण व लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.