लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमवर चर्चा करण्यासाठी बोलावलं असतं तर सर्वपक्षीय बैठकीला नक्की गेले असते असं बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे गरिबीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसंच महात्मा गांधींची 150 वी जयंती आणि 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने होणार्या सेलिब्रेशनचीही चर्चा करण्यात येणार आहे.
मायावती यांनी ईव्हीएमवरुन लोकांचा विश्वास कमी होत असून, त्यांना चिंता सतावत आहे असा आरोप केला. ईव्हीएम हा लोकशाही आणि राज्यघटनेसाठी धोका असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. या परिस्थितीत जर गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असती तर मी नक्की गेले असते असं मायावती यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
‘लोकशाहीत निवडणूक ही कधीच समस्या असू शकत नाही. तसंच खर्चाच्या दृष्टीनेही निवडणुकीकडे पाहिलं जाऊ नये. एक देश, एक निवडणूक ही संकल्पना खरंतर गरिबी, महगाई, बेरोजगारी, वाढत्या हिंसाचारासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असून फक्त एक भ्रम आहे’, असं मायावती यांनी म्हटलं आहे.