जळगाव,(प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश व शुक्रवारी दिवसभर पाऊस झाल्याने सूर नदीला भला मोठा पूर आला. त्यामुळे तालुक्यातील ६ गावांना या पुरामुळे फटका बसला आहे. दरम्यान, पावसाच्या जोर चांगलाच असल्याने जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात ५ जनावरांचा बळी गेला आहे.
जामनेर तालुक्यातील या गावांना पावसाचा तडखा
जामनेर तालुक्यातील सूर नदीला पूर आल्याने रांजणी, बेटावद येथे घरांच्या पडझडीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर शेवगे पिंप्री, देवळसगाव, कापूसवाडीतही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पशुधनाचे बळी
पारोळा तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आलेल्या पुरात शेवगे येथील दोन बैल वाहून गेले. तसेच अन्य तीन गावांमध्येही पशुधनाचे तीन बळी गेले.
तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गुरुवारी रात्री पाऊस सुरु असताना घरावर वीज पडून हर्षा गणेश मनोरे (३२) या तरुणीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.
बोदवड तालुक्यात २२ रोजी पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाचा लोणवाड, बेटावद व जामठी परिसराला अधिक फटका बसला. कुन्हा हरदो व धोंडखेडा येथील नाल्याला पूर आल्याने काही घरांचे व शेतीचे नुकसान झालेले आहे.तर अमळनेर तालुक्यातील कंकराज- भिलाली येथील कमलाकर हिमत पाटील (वय ५०) हे बोरी नदीच्या पुरात शुक्रवारी वाहून गेले. त्यांचा शोध सुरु आहे.