मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने यु-टर्न घेतला आहे. लोकसभेत सोमवारी शिवसेना सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नव्याने शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकावर लोकसभेत जे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले त्यावर जोपर्यंत समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत या विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज नमूद केले. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला विरोध करेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
देशामध्ये जे एक वातावरण तयार केलं जात आहे की, लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणले जाते, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे. लोकसभेमध्ये सोमवारी मांडलेल्या विधेयकाबद्दल स्पष्टता नीट दिसत नाही. कालच शिवसेनेने आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे. या विधेयकावर अनेक प्रश्न देशाला पडले आहेत, ते आम्ही सभागृहात सुद्धा मांडले व सामनाच्या माध्यमातून जाहीरपणे सुद्धा मांडले. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सुचवल्या आहेत, राज्यसभेत हे विधेयक येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत व यामध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
विधेयकाबाबत अनेक मुद्द्यांवर स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. जर या विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात काही भीती असेल तर त्यांची भीती दूर करण्याची आवश्यकता आहे. शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. राज्यसभेत या विधेयकावर विस्तृतपणे चर्चा व्हावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. देशाची चिंता फक्त आपल्यालाच आहे असे जर भाजपला वाटत असेल तर तो भाजपचा भ्रम आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.