नवी दिल्ली – लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘लोकसभेत जे झालं, ते विसरून जा. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा शिवसेनेची भूमिका सर्वांपुढं येईलच,’ असं शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व दुरुस्ती विधेयका काल लोकसभेत मांडण्यात आले. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलेली शिवसेना या विधेयकावर काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं होतं. मात्र, विधेयकात दुरुस्त्या सुचवून शिवसेनेनं लोकसभेत यास पाठिंबा दिला. त्यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. त्यामुळं शिवसेना राज्यसभेतही पाठिंबा देणार का, असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘शिवसेनेची वेगवेगळी भूमिका असत नाही. राष्ट्रहिताच्या मुद्द्याला शिवसेनेनं नेहमीच प्राधान्य दिलं आहे,’ असं सावंत यांनी सांगितलं.