जल आयोगाच्या केंद्रीय समितीच्या दिल्ली बैठकीत मिळाली मान्यता
गिरणा खोरे समृद्ध होणार – खासदारांच्या भक्कम पाठपुराव्याने शेतकऱ्यांना मिळाला न्याय
जळगाव – खान्देशच्या सिचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना तातडीने मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत,जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन, जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू.पी.सिंग यांच्याकडे केलेल्या भक्कम पाठपुराव्याला आज अखेर यश मिळाले असून आज जल आयोगाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सात बलून बंधाऱ्यांना मंजुरी मिळून गिरणा खोरे समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली आहे.
दिल्लीत आज मिळाली मान्यता-
आज दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यू पी सिंग तसेच केंद्रिय जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन यांच्या अध्यक्षतेखाली गिरणा नदीवरील वरील सात बलून बंधारे प्रकल्पाचे सादरीकरण झाले.यावेळी तापी पाट बंधारे महामंडळ कार्यकारी संचालक एस डी कुलकर्णी, सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, अधीक्षक अभियंता ए एस मोरे, कार्य.अभियंता पी आर मोरे, प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार इंजि. प्रकाश पाटील यांच्यासह भारत सरकारच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव, जल आयोगाचे सदस्य संचालक पियुष रंजन, श्री.मुखर्जी,जल आयोगाचे वडोदरा कार्यालयअधीक्षक,केंद्रीय तांत्रिक सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. आजच्या एकशे त्रेचाळीसाव्या बैठकीत सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटिल यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. *नामदार नितीन गडकरी तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मोठा पाठपुरावा केला असून तिला आज मान्यता देण्यात येत असून* त्याकरिता सातशे एक्क्याऐंशी कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी यावर खर्च होणार असल्याचे जलसंपदा विभागाचे यू पी सिंग यांनी बैठकीत सांगितले.
गिरणा खोरे समृद्ध होणार – खा. उन्मेश दादा पाटील-
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव यासह अर्धा जिल्हा सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरणार असलेल्या प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी जलशक्ति मंत्री ना. गजेंद्र शेखावत,जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू पी सिंग तसेच जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन यांच्याकडे सर्व पातळीवर पाठपुरावा करण्यात आलेला होता.अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकल्पाला आज मंजुरी मिळाली आहे. *गेल्या अडीच वर्ष्याच्या मेहनतीला फळ मिळाले असून ना.नितीन गडकरी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सात बलून बंधारे प्रस्तावास आज केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदील मिळाला असून देशातील महत्वाकांक्षी पहिला उबेर मेअर गेट अर्थात रबर युक्त बलून बंधारे प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.*
सात बलून बंधारे पूर्ण करणेसाठी खासदारांनी कंबर कसली होती या बंधाऱ्यामुळे खान्देश मध्ये जलक्रांती होईल.तसेच हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. कोणत्याही परिस्थितीत देशात पथदर्शी असलेला हा सात बलून बंधारे प्रकल्प मंजूर झाल्याने हा प्रकल्प पूर्ण करून गिरणा खोरे समृद्ध करणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
देशात पथदर्शी सात बलून बंधारे-
मेहूणबारे, बहाळ ( वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून यामध्ये साचणारे पाणी : 25.28 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने साचणार असून यासाठी सुमारे
अपेक्षित खर्च 781कोटी,32लाख येणार आहे. हा खर्च नीती आयोगाच्या डिमांड 48 या शिर्षकाअंतर्गत तरतुदी मुळे निधी मिळणार आहे या बंधाऱ्यामुळे एकूण
6471 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीतील पाणी बंधारे नसल्याने वाहून जाते. त्यामुळे गिरणा धरणापासून पुढील बाजूस असलेल्या नदीवर सात बलून बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर खासदार उन्मेश पाटील आमदार असताना यापूर्वीच ठेवण्यात आलेला होता यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार आहे
देशातील “माईलस्टोन” प्रकल्प मंजुरीने खासदारांचे सोशल मीडिया वर अभिनंदन
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते. धरणापासून तापी पर्यंत नदीच्या वाटेत कोठेही पाणी अडवले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी अडवले जाऊन त्याचा सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी खासदार उन्मेश पाटील या विषयाला प्राधान्य देत भक्कम पाठपुरावा सुरूच ठेवला होता. *आमदार असताना राज्यपालांकडून या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी खासदार उन्मेश पाटील यांनी मिळविली होती.* जिल्ह्यातील मेहुणबारे, बहाळ, परधाडे यासह इतर सात ठिकाणांची पाहणी करून जलआराखडा नसल्याची त्रुटी ते केंद्रीय जलआयोगाच्या वडोदरा कार्यालयाच्या परवानगी पर्यंत चा सर्व पाठपुरावा रात्रंदिवस सुरू ठेवला.या भागातील नदी पात्रात बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने यापूर्वीच वरिष्ठांकडे पाठविण्यात आलाहोता. याबाबत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र यापूर्वी उपलब्ध झाले होते. बधांऱ्यांच्या जागेसाठी सर्वेक्षण होऊन जागा निश्चिती देखील झाल्या होत्या. यासाठी बांधकामाचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली होती.
आज या प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने आजचा दिवस माझ्या गिरणा खोऱ्याच्या समृद्धीचा दिवस ठरणार आहे. खऱ्या अर्थाने आज गिरणा खोऱ्यात जलक्रांती साकारली जाणार असून गिरणा खोरे समृध्द करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि अभ्यासू खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.