मुंबई : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने २००४ पासून दोन दशकाच्या काळात विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीत निवडणूक लढविलेल्या राज्यातील १४,११७ उमेदवार आणि निवडणुकीत जिंकलेल्या लोकप्रतिनिधींचा अभ्यास करत या विश्लेषणाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला.त्यात राज्यात आमदार आणि खासदारांकडे किती संपत्ती आहे व किती टक्के लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यातून धक्कादायक माहिती अहवालातून उघड झाली आहे.
महाराष्ट्रात २००४ ते २०२३ या काळात निवडून आलेल्या १३२६ आमदार आणि खासदारांकडे सरासरी संपत्ती १० कोटी रुपये इतकी आहे. तर त्यातील ४० आमदार हे अब्जाधीश आहेत. तर ५० टक्के पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे या संस्थेचे सहसंस्थापक अजित रानडे यांनी सांगितले की, गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवरांना निवडणुका लढविण्यास रोखण्यासाठी कायद्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. रानडे हे पुण्यातील गोखले इन्टिट्यूट ऑफ अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू आहेत.
या अहवालात म्हटले आहे की, ‘सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले २२७ लोकप्रतिनिधी हे भाजप पक्षाचे आहेत. तर शिवसेनेचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले २०० लोकप्रतिनिधी गेल्या दोन दशकात निवडून आले आहेत .भाजपकडून निवडून आलेल्या उमेदवारांकडे सरासरी संपत्ती ही १४.३९ कोटी रुपये आहे. तसेच जिंकून आलेले १० उमेदवार अब्जाधीश आहेत.
दरम्यान, भाजपचे २००४ या वर्षापासून निवडून आलेल्या ३८६ खासदार आणि २२७ आमदारांवर गुन्हे दाखल आहे. तर काँग्रेसच्या २००४ पासून निवडून आलेल्या २६७ लोकप्रतिनिधींपैकी ९५ जणांवर गुन्हे दाखल आहेत.
तसेच शिवसेनेच्या २८३ पैकी २०० लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर राष्ट्रवादीच्या २५० लोकप्रतिनिधींपैकी १०७ लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर ६३ पैकी ४१ अपक्ष लोकप्रतिनिधींवर फौजदारी खटले दाखल झाल्याची माहिती आहे.