जळगाव – शहराचा विस्तार होतोय, त्याप्रमाणे नागरिकांना मुलभूत सुविधाही दिल्या गेल्या पाहिजे. त्याप्रमाणे प्रभाग 13 मध्ये मोहन नगर, रायसोनी नगर असा भाग आहे. नावालाच हा परिसर विकसीत असल्याचे चित्र असून प्रत्यक्षात रस्ते, गटारी, पथदिवे अशा मुलभूत सुविधांची वाणवा आहेत. खराब रस्ते, त्यामुळे उडणारी धूळ सहन करता येत नाही आणि सांगता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. कर वसूल करता मग सुविधा का देत नाही, असा सवालही यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.
रस्त्यांची दयनीय अवस्था – प्रभाग 13 मध्ये त्र्यंबक नगर, हतनूर कॉलनी, आदर्श नगर (काही भाग), संभाजी नगर, मोहन नगर, विवेकानंदनगर, डॉ. जाकीर हुसेन कॉलनी, दौलत नगर, समता नगर (दक्षिण भाग), देवेंद्र नगर, रायसोनी नगर या परिसराचा समावेश आहे. यापैकी प्रभागतील काही भागाचा विकास झालेला आहे. तर काही भाग अजूनही मुलभूत सुविधांच्या बाबतीत भकास असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असून नुसते खड्डे, खड्डे अन् खड्डेच अशी परिस्थिती आहे. या खराब रस्त्यांमुळे रस्त्यालगत घर असलेल्यांना दिवसभर धूळीचा त्रास सहन करावा लागतो.
पक्के नाही किमान मुरूमाचे तरी रस्ते करुन द्या – अवजड तसेच मोठ्या प्रमाणावर इतरही वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याने तीन तेरा झाले आहे. चढ, उतार अशा ओबडधोबड रस्त्यावर वाहनच काय पण पायी चालणेही अवघड झाले आहे. ज्येष्ठ नागरिक चालतांना अनेकदा पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यामुळे स्कूल व्हॅनही येत नसल्याची खंतही येथील नागरिकांनी व्यक्त केली. निवडून आल्यापासून नगरसेवक आलेलेच नाही. तक्रार केली की तेवढ्यापुरती पाहणी होते, यानंतर आज उद्यावर काम ढकलून ही समस्या आहे तशीच राहते. पक्के नाही पण किमान मुरूमाचे तरी रस्ते तयार करुन द्या, अशी केविलवाणी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.