शेळावे – येथून जवळ असलेले जि.प.प्राथमिक शाळा राजवड ता पारोळा या ठिकाणी शेळावे केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे व प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणुन शालेय पोषण आहार अधिक्षिका श्रीमती प्रिती पवार, बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, शेळावे केंद्र प्रमुख जितेद्र पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नागेश परदेशी, मुख्याध्यापीका पाकीजा पटेल उपस्थित होते.
वरील मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांचे व सर्व शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी धाबे शाळेचे गुणवंतराव पाटील यांना म.जोतीराव फुले गुरू गौरव शिक्षक पुरस्कार व राजवड हायस्कुलच्या श्रीमती बबीता पटेल यांना भारतरत्न मौलाना आझाद गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अगोदर राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व शाळेच्या मुख्याध्यापिका पाकिजा पटेल यांच्या इयत्ता 4 थी च्या विद्याार्थ्यांनी बनविलेल्या कला व कार्यानुभव विषयाच्या विविध वस्तुंचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून सर्वांना दाखविण्यात आले.
कै. यशवंत धोंडु पाटील यांच्या स्मरणार्थ रावसाहेब दिलीप यशवंत पाटील यांनी शाळेला डीजीटल साठी टिव्ही संच दिला म्हणुन रावसाहेब दिलीप यशवंत पाटील यांचा सत्कार व आभार मानण्यात आले. या प्रदर्शनात तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेने निवडलेल्या आदर्श विद्यार्थी अशा अकरा विद्यार्थ्यांना धाबे शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या कडुन विविध शैक्षणिक साहित्य बक्षिस देण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी आदर्श परिपाठ सादर केला. श्रीमती वैशाली बोरसे यांनी इ 1 ली च्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा ज्ञान रचनावादी आदर्श पाठ घेतला.
अध्ययन स्तर निश्चिती यावर श्रीमती वैशाली सोनवणे यांनी आपले अभ्यासपुर्ण मत मांडले. मुल्य शिक्षणावर श्रीमती पाकिजा पटेल यांनी सखोल मार्गदर्शन केले. श्रीमती प्रिती पवार यांनी हिवाळ्यातील सकस आहार बालकांना कसा दयावा या विषयी माहिती दिली. विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी स्थलांतरीत विदयार्थी त्यांचे शिक्षण व शिक्षण हमी कार्ड बाबत मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षिय भाषणात श्रीमती कविता सुर्वे म्हणाल्या की, कला व कार्यानुभव विषयाचे प्रदर्शन बघुन आनंद वाटला. टाकावू वस्तूंपासून टिकावु वस्तु बनविण्याची विद्यार्थ्यांची कला सुंदर आहे. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला वाव मिळुन त्यांची नवनिर्मितीची क्षमता वाढते, म्हणून या विषयांनाही इतर विषयांइतकेच महत्व द्यावे. प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्रीमती पाकिजा पटेल तर आभार रघुनाथ सरदार यांनी मानले.