मुंबई- लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेताना संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक सदस्य आपापल्या दैवतांची नावं घेत असतात. त्याला आक्षेप घेऊन शपथविधी रद्द करायचा झाल्यास भविष्यात संसदच बरखास्त करावी लागेल,’ असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर २८ नोव्हेंबर रोजी झाला. मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री व अन्य काही मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई-वडिलांना स्मरण करून शपथ घेतली. त्याला आक्षेप घेऊन भाजपनं हा शपथविधी रद्द करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं केली होती. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहातही हा मुद्दा मांडला.
विश्वास ठरावानंतर अभिनंदनपर भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपच्या या आक्षेपांचा समचार घेतला. ‘संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी शपथ घेताना ‘जय श्रीराम’ वगैरे म्हणतात. खरंतर ही नावे शपथ घेण्याच्या आधी किंवा नंतर घेतली जातात. शपथेचा मसुदा वाचताना तो सलग वाचला जातो, त्यात काही खंड पडत नाही. त्यामुळं त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि आक्षेप घ्यायचाच झाला तर उद्या संसदच बरखास्त करावी लागेल,’ असं भुजबळ म्हणाले.