जळगाव : जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यानुसार आज दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या दरम्यान, एक दुर्दैवी घटना घडलीय. वादळी वाऱ्यामुळे काही मजूर ज्या कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, त्याच कंटेनरच्या खाली येऊन दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली-धानवड गावामधील शासकीय रुग्णालयानजीक ही घटना घडलीय. भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा. चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर या घटनेत अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामाचं कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहेत. गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ आले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाले. त्यामुळे शेडमधील मजुरांनी हे पटांगणात उभ्या असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला.