मुंबई- देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड निर्माण करणार्या ठाकरे घराण्यातील तिसर्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. उद्या 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं.
त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती ठरणार आहेत. दरम्यान, शेतकर्यांना सर्व कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा शपथविधीपूर्वीच ठाकरे यांनी केली आहे. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
काल सोमवारी सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले.
तर उद्धव ठाकरे उद्या 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता शिवतिर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा होताच सर्व आमदारांनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ‘उद्धव ठाकरे आगे बढो’, महम तुम्हारे साथ है, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या.