मुंबई – राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकण्यासाठी तयार नव्हते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या सांगण्यावरुनच अजित पवारांचं मन वळलं असल्याचं बोललं जात आहे. प्रतिभा पवार यांनी अजितदादांना पवार कुटुंबाची संस्कृती लक्षात आणून दिली आणि त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करू, असा विश्वास भाजपला होता. पण राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी ऐनवेळी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्लॅन फसला असल्याचं भाजपच्याही लक्षात आलं. अजित पवार आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी अनेक नेत्यांनी अजितदादांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही अजितदादांची भेट घेतली. दादा, तू परत ये, अशी साद सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच घातली होती. पण अजित पवार ऐकण्यासाठी तयार नव्हते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्यानंतर सदानंद सुळे यांनीही अजितदादांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न केले.