मुंबई : कोरोनानंतर देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. देशात इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ आढळून आला आहे. महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. राज्यातील काही ठिकाणी H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात H3N2 चे 118 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण अहमदनगर आणि एक रुग्ण नागपूर येथील आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत काय म्हणाले?
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचं आवाहन केलं आहे. H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होता. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.
दुसरीकडे, राज्यातील सर्व खाजगी प्रॅक्टिशनर्सना मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली गेली आहे. जर 24 तासांच्या आत ताप कमी झाला नाही तर चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir हे औषध ताबडतोब सुरू केले जावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.