मुंबई – महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असतील आणि त्यांनी यासाठी होकार दिला आहे’, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राने त्यांचा अहंकार संपवला, अशा शब्दात नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली.
हंगामी अध्यक्षांच्या माध्यमातून ऑन कॅमेरा बहुमत सिद्ध करता येणार नाही हे त्यांच्या (भाजप) लक्षात आलं. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. हे गोवा, मणिपूर आणि कर्नाटक नाही हे पवार साहेबांनी कालच सांगितलं होतं. त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. आता आमदारांच्या बैठकीत नेता निवडीचा कार्यक्रम होईल. यापूर्वी पवार साहेबांच्या उपस्थितीत बैठक झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि उद्धव ठाकरेंनी समोरासमोर होकार दिला आहे,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
शिवसेना ही भाजपसोबत जाऊन बिघडली होती, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता, असं नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, तीन चाकांचं सरकार टीकणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यापूर्वी केली. पण हे सरकार फक्त पाच वर्षे नाही, तर त्यापुढेही चालेल असं उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं आहे. त्यामुळे हे सरकार समर्थपणे काम करत राहिल, असंही मलिक म्हणाले.