मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या . यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली असून याद्वारे महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता वर्षिक 12000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार आहे. राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरेल,
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारही मदत करणार आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार देणार आहे. त्यामुळेच केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये गरजू शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे,” असं फडणवीस यांनी या योजनेबद्दल सांगताना जाहीर केलं.
“पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. मात्र यापुढे शेतकर्यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकार पिक विम्याचा संपूर्ण हफ्ता भरणार आहे. त्यामुळेच शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे,” असंही फडणवीस यांनी सांगितलं.