मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर मागील चार दिवसापासून अवकाळीचे संकट आले आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीठ झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून पुढील ३-४ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाश्चिमात्य वाऱ्यांमुळे अरबी समुद्रावर दाब निर्माण झाला आहे. यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबई ठाणे, पालघर, नाशिक अहमदनगर, छ. संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग, तसेच मराठवाड्यावरही मध्यम ते तीव्र स्वरुपाचे ढग दाटले आहेत. 3, 4 तासांत या भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
8 मार्चपर्यंत राज्यावर अवकाळीचे ढग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. 8 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अवकाळीचे ढग दूर होतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.