मुंबई : देशातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. येत्या २४ तासांत देशातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे अनेक राज्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे. थंडीने काढता पाय घेण्याआधीच महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशातच उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
दुसरीकडे, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह राजस्थानच्या अनेक भागात आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात हलका पाऊसही पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत उत्तर-पश्चिम दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्ली आणि दिल्ली-एनसीआरच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचबरोबर हरियाणाच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम 28 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशांवर म्हणजेच डोंगराळ राज्यांवर होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये २ मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २ मार्चनंतर हवामानात बदल होईल आणि ३ मार्चनंतर हवामान कोरडे होऊ लागेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.