औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीत लिलावाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पैशाची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचं समोर आलं आहे. मतदारांच्या मताच्या अधिकारातून निवडून दिलेल्या उमेदरांकडून सरपंच, उपसरपंच अशा पदासाठी पैशांची उधळण सुरु होती. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात हा प्रकार घडला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार घडला आहे. सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आला होता.
सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव केला. ग्रामपंचायत लिलावाचा व्हिडीओ news18लोकमतच्या हाती लागला आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा इन्कार केला आहे. मात्र गावातील नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली दिली आहे.
शकुंतला योगेश ससेमहल असं 14.50 लाख रुपये देऊन सरपंचपदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. तर राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने हा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.