मुंबई : गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची चर्चा सुरू आहे. ही युती जवळ जवळ झाल्यात जमा आहे. फक्त जाहीर घोषणा होणं बाकी आहे. असं असताना आज प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी तब्बल अडिच तास बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं.
अखेर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपसोबतच्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने भाजपासोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं आंबेडकर यांनी?
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा केला आहे. प्रत्येक भेट ही राजकीय नसते. इंदू मिलमधील स्मारकासंदर्भात मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षांना पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गट जर भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडला तर पाठिंबा देण्याचा विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.