मुंबई : राज्यात महावितरण कंपनीबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांना भरमसाठ वीजबिल आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. मात्र आता महावितरणकडून ग्राहकांसाठी एक गुडन्युज आलीय.
मीटर रीडिंगमध्ये घोळ घालत ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात मोठे यश मिळवले आहे. हा घोळ ४५ टक्क्यावरून केवळ १.९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, नवीन वर्षात तो शून्य टक्के करण्याचा मानस असल्याने अचूक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांची लूट पूर्णपणे थांबणार आहे.
राज्यात महावितरणचे साधारणत: दोन कोटी ९० लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या मिटरचे फोटो काढून बिलिंग केले जाते. हे काम ६०० कंपन्यांना दिले आहे. पण गेले दोन तीन वर्षे या कंपन्यांच्या कामाबाबत प्रचंड तक्रारी होत्या. अस्पष्ट फोटो काढणे, मीटर ऐवजी भिंतीचा फोटो काढणे, मीटरचा फोटो व्यवस्थित न काढणे, तो काढता घरात बसून परस्पर दुसराच फोटो सर्व्हरला लोड करणे अशा असंख्य तक्रारी होत्या.
याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला. ७६ कंपन्यांना बडतर्फ करण्याबरोबरच अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली. संबंधित अधिकारी व सर्व कंपन्यांची बैठक घेऊन सतत पाठपुरावा केला.
आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये महावितरणकडे दहा लाख २२ हजार तक्रारी आल्या होत्या. पण गेल्या नऊ महिन्यात हा आकडा कमी आला. डिसेंबर २०२२ पर्यंत तो २.७२ लाख इतका कमी झाला. आहे. राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण जानेवारी २०२२ मध्ये ४५.६ टक्के होते. ते प्रमाण नोव्हेंबर २०२२ मध्ये १.९ टक्के इतके कमी झाले. महावितरणने केलेल्या या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनही केले.
या अचूक रिडिंगमुळे महावितरणच्या नफ्यात दरमहा साधारणता अडीचशे कोटीचा महसूल वाढला. यामुळे वार्षिक तीन हजार कोटींचा महसूल वाढल्याने संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम झाली.